शेतकऱ्यांच्या अडचणींची जाण असणाऱ्या स्व.अजित दादांमुळेच
मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे-आ.आशुतोष काळे
सात गावातील ८६४ हेक्टर क्षेत्राला मिळणार जीवदान
कोपरगाव सदीप विदुर – कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मंजूर, चास नळी, बक्तरपूर,धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावातील शेती व शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी भल्या पहाटे अजितदादांची भेट घेवून त्यांच्यापुढे वास्तव परिस्थिती मांडली होती. त्यावेळी शेतकऱ्यांची जाण असलेल्या अजितदादांनी दुरुस्तीच्या कामासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४१.५१ कोटी निधी दिल्यामुळे मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.

आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मंजूर, चास नळी, बक्तरपूर,धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावातील ग्रामस्थांसमवेत गुरुवार (दि.०४) रोजी मंजूर बंधाऱ्याच्या अंतिम टप्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे मंजूर बंधारा आजवर तब्बल तीन वेळेस वाहून गेल्यामुळे मंजूर बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या मंजूर, चास नळी, हंडेवाडी,धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावातील शेती व शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय होवून त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला होता. त्यामुळे मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे सातही गावातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने पाहत होते. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावू असा शब्द दिला होता. त्यासाठी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन प्रस्ताव आणि डिझाईन तयार करून घेतली. हा प्रस्ताव मंत्रालयात जलसंपदा विभागात स्वत: घेऊन गेलो असता त्यांनी जल संधारण विभाग, जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार विभागाकडे पाठविले. प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अनंत अडचणी पण आल्या अखेर हे काम जलसंपदा विभागाचे असल्यामुळे जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव सादर करुन तातडीने मंजुरी मिळवली आणि अजितदादांच्या अनमोल सहकार्यातून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४१.५१ कोटी निधी मिळविण्यात यशस्वी झालो.
मंजूर बंधाऱ्याचे काम अंतिम टप्याकडे जात असतांना जेवढा निधी मंजूर बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी लागला नाही त्याच्या कित्येक पट निधी दुरुस्तीसाठी खर्च होणार असला तरी यामागे स्व.अजितदादा पवार यांचे अनमोल योगदान असल्यामुळे त्यांची प्रकर्षाने आठवण येते. मागील वर्षी काम सुरु केले होते परंतु पावसाळा लवकर सुरु झाल्यामुळे झालेले काम वाया गेले. परंतु चालूवर्षी पावसाळा सुरु व्हायच्या आत काम पूर्ण करण्याच्या आणि काम दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत. त्यामुळे चालूवर्षी मंजूर बंधाऱ्यात पाणी अडविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प.पू. श्री शिवानंदगिरीजी महाराज, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, मंजूर, कारवाडी, हंडेवाडी, चासनळी, धामोरी, मोर्विस, वडगाव, बक्तरपूर, मायगाव देवी, सुरेगाव, वेळापूर, सांगवी भुसार आदी गावांतील शेतकरी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशक्यप्राय गोष्ट आ. आशुतोष काळेंनी शक्य करून दाखवली —-
नैसर्गिक संकटामुळे तीन वेळा मंजूर बंधारा वाहून गेला. तिसऱ्यांदा ज्यावेळी हा बंधारा वाहून गेला त्यावेळी विहिरी, शेतकऱ्यांच्या जमिनी उभ्या पिकांसह वाहून जातांना व ज्यांनी ज्यांनी मंजूर बंधाऱ्याचे झालेले अतोनात नुकसान पाहिले त्यांनी हा बंधारा पुन्हा दुरुस्त होईल हि अपेक्षाच सोडून दिली होती. बंधाऱ्याची दुरावस्था पाहून ज्यांच्याकडे या बंधाऱ्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी होती त्यांनी देखील हात झटकले होते. त्यामुळे एकूणच मंजूर बंधारा पुन्हा दुरुस्त होणे हि अशक्यप्राय गोष्ट होती. मात्र हि अशक्य गोष्ट आमदार आशुतोष काळे यांनी शक्य करून दाखविली. -शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया







